‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ मुळे, आगामी मंदीची आवर्तने ही गुंतवणुकीची संधी (भाग-१)
‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ मुळे, आगामी मंदीची आवर्तने ही गुंतवणुकीची संधी (भाग-२)
या दीर्घ आवर्तनांत, १९९१ पासून बाजार अनेक लघु परंतु तीक्ष्ण उतार-चढ़ावातून गेलाय. १९९१ पासून आपल्या बाजारात सात तेजीची आवर्तनं आणि सहा वेळी मंदीची आवर्तनं झाली ज्याचा कालावधी व तीव्रता भिन्न भिन्न होती. बाजारानं १९९१-९२ या एकाच वर्षात २६०% तेजी अनुभवली तर २००३ – २००८ च्या दीर्घ तेजीमध्ये सेन्सेक्स ३००० ते २१००० पर्यंत वाढला आणि त्यानंसुमारे ५७ महिन्यांत ६०० टक्के परतावा दिला. ऑक्टोबर २००८ ते नोव्हेंबर २०१० या दोन वर्षांत सेन्सेक्स तब्बल १३४०० अंशांनी वाढला. आता, जानेवारी २०१२ पासून सुरु असलेली तेजी अजून तरी संपायचं नांव घेत नाहीय. तशाच प्रकारे या कालावधींमधील मंदीची आवर्तनं देखील भयावह होती. १९९२-९३ दरम्यान बिग बुल घोटाळ्यात बाजारानं ५६% आपटी खाल्ली. २०००-२००१ च्या सुमारास टेक्नॉलॉजीचा फुगवटा फुटला व बाजार पडला. त्यानंतर २००८ च्या सुरवातीस सबप्राइम पेचामुळं जागतिक मंदी आली व त्यास आपला बाजार देखील अपवाद नव्हता. त्यासुमारास बाजार हा १४च महिन्यांत ६३ टक्क्यांहून अधिक धुतला गेला. त्याचप्रमाणे बाजारानं१९९४ ते १९९८ दरम्यान तीव्र नाही परंतु प्रदीर्घ मंदी अनुभवली.
या प्रमुख आणि दीर्घ काळातील आर्थिक आणि बाजारातील आवर्तनांमध्ये लहान परंतु तीव्र तेजी-मंदीची आवर्तनं देखील होती. परंतु, महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की, दीर्घ काळात अर्थव्यवस्था उच्च वाढीच्या मार्गावर जाते आणि बाजार देखील त्यानुसार उच्च पातळीवर संक्रमण करतो. १९९१ पासून भारताचाजीडीपी १० पट वाढला आणि बाजार (सेन्सेक्स) ४० पट वाढला. पुढं भविष्यात देखील अर्थव्यवस्थेत व बाजारात अशीच आवर्तनं दिसू शकतील. नीतिआयोगानं २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही १० ट्रिलियन म्हणजेच १० लाख कोटी अमेरिकी डॉलर्स होईल असं सूतोवाच केलेलं आहे. जरी आता हा आकडा भला मोठा वाटत असला तरी आपण भारतीय, जर भारताकडं येणाऱ्या दशकांतील जगातील एकमोठी अर्थव्यवस्था म्हणून पहात असू तर आज अमेरिकेची अर्थव्यवस्था हीच मुळी २१.५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स आहे. मग त्यापुढं १० ट्रिलियन डॉलर्सचा अंदाज नक्कीच शाश्वत वाटू शकतो, परंतु त्या दरम्यान बाजारात येणारी मंदीची आवर्तनं देखील एक संधी असू शकते हे मात्र विसरून चालणार नाही.
ज्याप्रमाणं सध्याच्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा आहेत त्याचप्रमाणं बाजाराच्या देखील आहेत कारण या सरकारला मागील पाच वर्षात आणलेल्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यास मिळालेला अवधी व त्याचा अर्थव्यवस्थेस व पर्यायानं बाजारास होणारा फायदा. त्यामुळं एकूणच, येत्या गुरुवारी जाहीर होणारं रिझर्व्ह बँकेचं द्विमासिक पतधोरण, त्याकडून बाजारास असणाऱ्या अपेक्षा आणि पुढील महिन्यात मांडला जाणारा अर्थसंकल्प यांवर बाजार आपली प्रतिक्रिया दिल्यावाचून राहणार नाही. त्यामुळं आरबीआय किंवा नवनिर्वाचित अर्थमंत्री यांच्यावर अवलंबून न राहता, बाजार तेजी वा मंदीमध्ये असताना त्यावर लक्ष ठेऊन त्यानुसार आपली बाजारातील धोरणं बदलती ठेऊन आपलं लक्ष्य साध्य करणं हेच काय ते आपल्या हातात आहे, पाहुयात कसं जमतंय ते !