दुष्काळी कहर सहन केल्यानंतर आता महागाईचा दणका
जामखेड: आगोदरच नापिकी व सातत्याने दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे. आता पुन्हा उडीद, सोयाबीन, तूर बियाणे व खतांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने आता शेतकरी खत, बियाणे दुकानाकडे वळू लागले आहेत. गतवर्षी खरीप, रब्बी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. असे असले तरी आता पूर्व मोसमी पाऊस व बदलते वातावरण यामुळे केव्हाही वरुणराजा बरसेल आणि पेरणीस सुरुवात होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी पावसाअगोदर बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवत आहेत. खते, बियाण्यांचा तुटवडा होवून पाहीजे ती खते, बियाणे मिळत नाहीत तर काही चढ्या दराने घ्यावे लागतात म्हणून शेतकरी सध्या सरसावल्याचे दिसत आहेत. खते, बियाण्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च अधिकच वाढत असल्याने शेतकरी निराश दिसत आहेत.
निसर्गाचा कहर परिसरात चांगलाच जाणवला होता. पारंपारिक शेती करणाऱ्यांना याचा तर फटका बसलाच आहे. शिवाय बागायतदार शेतकऱ्यांनाही याची झळ पोहोचली आहे. त्यांना पाण्याअभावी आपल्या शेतातील विविध फळबागांवर कुऱ्हाड चालवावी लागली आहे. डाळींब, द्राक्ष आदींच्या फळबागा दुष्काळामुळे जमिनदोस्त झाल्या आहेत.
महागाईचा दणका
परिसरातील शेतकरी याच खतांचा वापर अधिक प्रमाणात करतात. या खतांच्या किमतीत वाढ झाल्याने पेरणीवर होणारा खर्चही वाढणार आहे. निसर्गाचा तडाखा सहन केल्यानंतर आता महागाईचा दणका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. – परमेश्वर जायफळे, शेतकरी.