रवींद्र कदम
नगर – जनावरांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या “त्या’ चारा छावण्यांना लोकसभा निवडणुकीमुळे दिलासा मिळाला आहे. या छावणीचालकांना हलगर्जीपणाबद्दल नोटीसा बजावल्या जाणार होत्या. परंतू त्यांचा परिणाम थेट निवडणुकीवर होण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने आता या नोटीसा निवडणुकीनंतर बजावण्याची भूमिका घेतली आहे.
प्रशासनाने अचानक ही भूमिका घेतल्याने कर्मचारी वर्ग उलटसुलट चर्चेला उधान आहे आहे. या कारवाईने मतदान प्रक्रीयेवर काही परिणाम होईल का? असा सवाल ही जनसामान्यामधून उठत आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा आणि पाणी मोफत उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार सहकारी संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या छावणी प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. आजमितीस 394 छावण्यांत एकूण 2 लाख 28 हजार 441 जनावरे दाखल आहेत.
छावण्यामध्ये जनावरांसाठी दिवसाआड पशुखाद्य देणे, शासनाने ठरवून दिलेल्या मापात चारा उपलब्ध करणे, छावणीत सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध करणे, जनावरांचे आवक-जावक रजिस्टर अद्ययावत ठेवणे, छावणीत विद्युतप्रकाश, अग्नीशमन यंत्र अशा विविध सोईसुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश असताना देखील, छावणीचालकांकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानूसार चारा छावणी चालकांविरोधात प्रशासनाने नोटीसा काढल्या आहेत. परंतु या नोटीसा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर संबंधितांना बजाव्यात असेही सांगण्यात आले आहे. या नोटीसांचा मतदान प्रक्रीयेवर काही परिणाम होइल का? असा प्रश्न ही उपास्थित होत आहे.