वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते महामंडळाला पोलिसांचे पत्र
पुणे – उन्हाळयाच्या सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे आगामी काळात पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर वाहनांची आणि प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यातून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामार्ग पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी महिनाभरात या महामार्गावर दरड काढण्याचे अथवा अन्य कोणतेही काम सुरू न करण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे, त्यासंदर्भात राज्य रस्ते सुधारणा विकास महामंडळाला पत्र देण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर दरडी कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, विशेष म्हणजे पावसाळयाच्या काळात घाट माथ्यावर हे प्रकार सातत्याने घडत असतात. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांनाही धोका निर्माण होत आहे, हा धोका टाळण्यासाठी महामार्ग पोलीस आणि रस्ते सुधारणा विकास महामंडळाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून घाट माथ्यावरील दरडी काढण्याचे काम हाती घेण्यात येते. विशेषत: पावसाळा सुरू होण्याच्या आधी एक ते दीड महिना या कामाला वेग येतो. बहुतांशी वेळा हा महामार्ग वाहतुकीसाठी तीन ते चार तास बंद ठेवण्यात येत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत असतो. परिणामी त्याचा त्रास महामार्ग पोलीस, वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्याशिवाय जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरही त्याचा ताण येत आहे, त्यामुळे यंदा सुट्टयांच्या कालावधीत ही कामे हाती घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी महामार्ग पोलीसांच्या वतीने राज्य रस्ते सुधारणा विकास मंडळाकडे करण्यात आली आहे.
…पण आज बंद
राज्य रस्ते सुधारणा विकास महामंडळाच्या वतीने उद्या (दि. 9) दुपारी 12 ते 2 यावेळात हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचा ताण वाहतुकीवर आणि विशेषत: जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर येणार आहे. ही बाब आणि सुट्ट्यांचा कालावधी लक्षात घेऊन यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.