खटाव – ऐन दुष्काळातही माणुसकीचा झरा जिवंत असल्याचे उदाहरण खटावनगरीत घडत आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांना इकडे-तिकडे भटकावे लागत असताना खटाव येथील रवी बोबडे व त्यांच्या पत्नी सौ. बोबडे हे दांपत्य आपल्या स्वमालकीच्या बोअरवेलमधून रोज सकाळी 8 ते 9 या वेळेत येईल त्या व्यक्तीस मोफत पाणीपुरवठा करीत असतात. त्याच्या या उपक्रमाचे गावात सर्वत्र कौतुकच होत आहे. इतरांनीही त्यांचा या दातृत्वाचा आदर्श घ्यावा, असेही लोकांमधून बोलले जात असून दुष्काळातही माणुसकीचा झरा मात्र खळाळत असल्याचे स्पष्ट होत आहे.