संगमनेर: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियानाने यंदा शेतकऱ्यांसह नागरिकांची निराशा केल्याचे चित्र आहे. दरवर्षी या अभियानाच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. संगमनेर तालुक्यात ज्या गावांची या अभियानासाठी निवड केली होती. त्यापैकी 111 गावे जल परिपूर्ण (पाणीदार) झाल्याची घोषणा प्रशासनाने केली होती. मात्र सध्या 41 गावे आणि 250 वाड्या सद्यःस्थितीत तहानलेल्या आहेत. यासंदर्भात मात्र अभियानाची मुख्य जबाबदारी असलेल्या कृषी विभागाने यंदा पाऊसच कमी पडल्याने जलयुक्तच्या गावांत टंचाई असल्याचा दावा केला आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यात 2015-16 मध्ये पहिल्या टप्प्यात 38 गावांची निवड करण्यात आली होती.या गावांमध्ये जलयुक्त अंतर्गत 2 हजार 336 कामे करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 2016-17 मध्ये 35 गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये 1 हजार 391 कामे करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात 38 गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये 944 कामे हाती घेण्यात आली. पहिल्या तीन टप्प्यात निवडलेली 111 गावे जलयुक्तच्या कामांमुळे जलपरिपूर्ण (पाणीदार) झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते.
या गावांमध्ये नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत पाणीटंचाई नव्हती. ज्या गावाच्या परिसरात ही कामे झाली तेथील शेतातील विहिरींना चांगले पाणी होते. पिकांची वाढही चांगली होऊन उत्पन्न चांगले येत होते.गावातील जनावरांसाठीही पाणी मुबलक होते. मात्र, जसजशी उन्हाची तीव्रता वाढली तसतसे जलयुक्त मधील पाणी आटले. जलयुक्तच्या कामांमुळे या गावांमधील जलपातळीत वाढ होणे अपेक्षित होते; परंतु या गावांना आता पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या असून, तालुक्याच्या पाणीटंचाईची स्थिती बिकट बनत चालली आहे. सध्या 41 गावे आणि 250 वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहोचल्या असून, टंचाई आराखड्यांतर्गत या गावांमध्ये उपाययोजना राबविल्या जात आहेत. जलयुक्तच्या कामांमुळेही शाश्वत पाणी मिळू शकत नसल्याचे चित्र निर्माण झाल्याने अभियानातील कामे अधिक चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे.
जलयुक्त शिवारांतर्गत यंदाही चांगली कामे झाली.यामुळे शेतकऱ्यांना जानेवारी अखेर पिकांना पाणी देता आले. यंदा पाऊसच कमी पडल्याने जलयुक्तच्या कामांमध्येही पाणी हव्या त्या प्रमाणात जिरले नाही.
– कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी.