अरुणोदय गोशाळेस जनावरांच्या चाऱ्यासाठी देणगी
नगर: गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. माणस कशीही जगतील पण शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्तींनी हे पशुधन वाचविण्यासाठी पुढे येवून मदतीचा हात देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
जिल्हा लेबर फेडरेशनचे उपाध्यक्ष विकी जगताप व मनिष चोपडा यांच्या वाढदिवसानिमित्त आ.संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने अरुणोदय गोशाळेत मुक्या जनावरांसाठी चारा घेण्यासाठी मदत निधी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांच्या हस्ते गोशाळेचे संचालक मनीष फुलडहाळे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी आ. जगताप बोलत होते. यावेळी प्रा.माणिकराव विधाते, रेश्माताई आठरे, नगरसेवक संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, विपुल शेटिया, बाबासाहेब गाडळकर, गुड्डू खताळ, संग्राम सूर्यवंशी, अनुप काळे, सौरभ दिवाणी, गौरव कचरे, वैभव वाघ, संतोष लांडे, शिवा कराळे, सतीश ढाकणे, नितीन लिगडे, मळू गाडळकर, भूपेंद्र परदेशी, संभाजी पवार आदी उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले, यावर्षी अत्यल्प पावसामुळे चारा टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे मुक्या जनावरांची मोठी हेळसांड होत आहे. अनेक शेतकरी आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने आपली जनावरे अरुणोदय गोशाळेत आणत आहेत. दुष्काळामुळे या गोशाळेतील जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत साधू संतांनी मांडलेले विचार अंमलात आणून शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी समाजातील दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे.
शिवशंकर राजळे म्हणाले,आ. संग्राम जगताप व त्यांचे मित्रमंडळी यांच्या मार्फत सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या भीषण दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी त्यांनी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. समाजाप्रती आपली काहीतरी बांधिलकी असते, ती जपण्यासाठी मुक्या जनावरांना चारा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.अशाच पद्धतीने समाजातील दानशुरांनी पुढे येणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.