नवी दिल्ली – केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा राहुल गांधी यांच्या निर्णयातून उत्तर आणि दक्षिण भारत दोन्ही ठिकाणांवरून विजयी होण्याचा आत्मविश्वास दर्शवतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ किंवा तामिळनाडूतून निवडणूक लढवण्याचे धाडस दाखवू शकतील का, असा सवालकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेतेशशी थरूर यांनी उपस्थित केला आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा सवाल उपस्थित केला. राहुल गांधी वायनाडला “पळून गेले’ या मोदी यांनी केलेल्या टीकेचाही थरूर यांनी समाचार घेतला. सत्तारुढ पक्षाने वारंवार कट्टरतावाद जोपासला आहे. मोदींनी पंतप्रधानपदाला न शोभणारे वर्तन केले आहे. पंतप्रधान हे सर्व देशवासियांसाठी पंतप्रधान असतात, असे थरूर यांनी म्हटले आहे.
वर्धा येथील सभेमध्ये बोलताना मोदींनी विरोधी नेते बहुमत असलेल्या ठिकाणांवरून पलायन करायला लागल्याची टीका केली होती. त्यावर 1947 साली स्वातंत्र्यानंतर देशाने स्वीकारलेल्या संघराज्य सहकार्याच्या तत्वावर ताण यायला लागल्यानेच राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवड्णूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे थरूर म्हणाले. दक्षिणेकडील राज्यांमध्ये आर्थिक सुरक्षिततेसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दक्षिणेतील राजकीय प्रतिनिधीत्वाचाच प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी उत्तर-दक्षिण भेद दूर करण्यासाठीच वायनाडमधून निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्याचेही थरूर म्हणाले.