लखनौ – जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांचा खात्मा करताना जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची काय असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. ते आज उत्तरप्रदेशातील एका निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. जम्मू काश्मीरात शोपियां येथे आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्याचा संदर्भ देऊन त्यांनी हे विधान केले.
ते म्हणाले की तेथे दहशतवादी आपल्या जवानांच्या समोर बंदुका आणि बॉंम्ब घेऊन बसले आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्या जवानांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन परवानगी घ्यायची काय असा सवाल त्यांनी केला. जवानांच्या कारवाईचा निवडणुकीसाठी वापर करण्यात येऊ नये असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. तरीही मोदींकडून सातत्याने जवानांच्या कारवाईचा प्रचारात वापर झाल्याने विरोधकांनी त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. आता त्यांच्या या विधानावरूनही वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.