नवी दिल्ली – कॉंग्रेस अजून जीवंत असून ती पुन्हा कधीही उसळी घेऊ शकेल. त्यामुळे पत्रकारांनी इतक्यात कॉंग्रेसचा मृत्यूलेख लिहीण्याची घाई करू नये अशी प्रतिक्रीया केरळातील कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिली आहे. तथापी कॉंग्रेसकडे आता पराभवाच्या जखमा कुरवाळत बसण्याची वेळ उरलेली नाही पक्षाने आता काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.
कॉंग्रेस पक्षाला नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत दारूण पराभवला सामोरे जावे लागले असले तरी स्वत: थरूर हे मात्र थिरूवनंतपुमरम मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. ते म्हणाले की आजही भाजपला केवळ कॉंग्रेस हाच एकमेव विश्वासार्ह राजकीय पर्याय आहे.
गांधी नेहरू कुटुंबाने देशासाठी मोठे योगदान दिले आहे. आणि या घराण्याचा देशावर मोठा प्रभाव असल्याने याच कुटुंबातील व्यक्तीच्या हातात पक्षाचे भवितव्य सुरक्षित राहील असे मतही त्यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी पक्षाच्या विजयासाठी अपार कष्ट घेतले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या विषयी लोकांच्या मनात अजूनही विश्वास कायम असल्याने तेच पक्षाचे नेतृत्व करण्यास सध्या अत्यंत योग्य व्यक्ती आहेत असेही थरूर यांनी नमूद केले आहे.