पवारसाहेबांवर टीका करणे म्हणजे स्टंट ः बाळासाहेब सावंत
मलवडी – पवार साहेब हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, विरोधकही त्यांचा आदर करतात. मात्र स्वतःला प्रसिद्धी मिळावी यासाठी स्टंटगिरी करणे ही नेहमीचीच सवय आहे. पवार साहेबांचे योगदान उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या मतांची काळजी करू नका, त्यापेक्षा आपली स्वतःची मते किती ते एकदा जनतेला सांगा असा सवाल राष्ट्रवादीचे माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी शेखर गोरे यांना केला.
माण- खटावमधील राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष आघाडीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन मिळालेली मते आहेत. ही लोक अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही सोयीनुसार पक्ष बदल करून काम केले नाही. स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या ना पक्षाची एकनिष्ठता काय असते हे कळणार नाही. माण-खटावमध्ये पवार साहेबांवर श्रध्दा असणारे हजारो कार्यकर्ते आहेत. त्यांची बांधिलकी शरद पवार कै. सदाशिवराव पोळ यांच्या विचाराची आहे. त्या लोकांनी काय करावे आणि कसे वागावे हे पक्ष बदलूनी शिकवू नये. विरोधी पक्षातील लोकही शरद पवारांशी आदराने वागतात.
शरद पवारांनी निवडणुका झाल्या की लगेच दुष्काळी दौरा केला. लोकांच्या मागणीनुसार माणुसकीचा दृष्टीकोन ठेवून तातडीने पाण्याचे टॅंकर सुरु केले. मुख्यमंत्र्यांशी स्वतः चर्चा केली. माढामध्ये खासदार असताना माण-खटावला झुकते माफ दिले. यासाठी 200 कोटीपेक्षा जास्त निधी दिला. त्यातून प्रत्येक गावात मोठा पाणलोट उभा राहिला. वॉटरकपचे काम तीन वर्षे तालुक्यात सुरु आहे. पहिल्या वर्षी दीड कोटी गेल्यावर्षी साडेसहा कोटी व यावर्षी दीड कोटी स्वतःसह इतरांच्या फंडातून दिले. सामाजिक जाणीव असणारे व संवेदनशीलता असणारे फार थोडे नेते आहेत. त्यात पवारांचा अग्रक्रम आहे.
मोठ्या माणसावर चिखलफेक करुन स्टंटगिरी करायची आपली जुनीच सवय आहे. म्हसवड परिसरातील सोलर प्लॅंटवर तुम्ही काय कर्तृत्व केले ते परिसरातील लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. अशा माणसांनी पवारावर टीका करायचे बंद करावे. तुम्हाला खरेच राष्ट्रवादीकडून धमक्या येत असतील तर जे कोणी असतील त्यावर पोलीस केस करावी, उगीच खोटे आरोप करु नयेत. आपण मतांमध्ये खूप तज्ञ आहात तर युतीला पडलेली मते कोणाची किती हे एकदा जनतेच्या माहितीसाठी सांगावे.
कोणी उभे रहावे, कोणी लढावे हे आमचा पक्ष ठरवत असतो. पक्षाशी एकनिष्ठ असणारी आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे पक्ष देईल तो उमेदवार तुमच्या पुढे असेल तो आम्ही निवडून आणू आता तुम्ही आमची काळजी करायची गरज नाही. जिथं जाल तिथं प्रामाणिक रहा असा सल्लाही यावेळी सावंत यांनी दिला. यावेळी युवराज सुर्यवंशी, किरकसालचे सरपंच अमोल काटकर, सुरेंद्र मोरे, रमेश शिंदे उपस्थित होते.