पिंपरी – “पिंपरी-चिंचवड शहरात आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न केला मात्र सध्या सत्तेवर आलेल्या पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. विकासाचे व्हिजन, प्लॅनिंग नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची टीका करतानाच निवडणुकीत यश अपयश हे नक्की येत असते. विजय झाला म्हणून हुरळून जायचे नसते आणि पराभव झाला म्हणून खचायचे नसते,’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
नेहरुनगर, पिंपरी येथे एका खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. ते म्हणाले, “सध्या कायदा सुव्यस्थेचा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे. जातीय सलोखा बिघडविण्याचे प्रकार सुरू असून हे सर्व प्रकार धक्कादायक आहेत. राज्यात, देशात व ठिकठिकाणी सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपविण्याचे षडयंत्र सत्ताधारी राबवित आहेत. मात्र हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही.’