“मी तुमच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी दररोज दारोदारी फिरत आहे”
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच माध्यमांच्या प्रकाशझोतात राहणाऱ्या साक्षी महाराज यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानाद्वारे नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावेळी साक्षी महाराज यांनी थेट मतदार राजालाच धमकावले असून ते म्हणतात, “तुम्ही मला नाकारलत तर मी तुम्हाला शाप देईन, तुमच्या आयुष्यात असलेला आनंद मी हिरावून घेईन.”
“मला मत द्या अन्यथा मी तुम्हाला शाप देईन” असं म्हणत साक्षी महाराजांनी निदान निवडणुकांच्या काळामध्ये तरी मतदारांची मर्जी राखण्याची भारतीय राजकारणातील परंपरा देखील खंडित केली असून ते पुढे म्हणतात, “मी एक संन्यासी माणूस आहे. तुम्ही मला निवडून दिलंत तर मी निवडून येईन. निवडणूक हरलो तर देवळात भजन किर्तन करेन. मात्र तूर्तास मी तुमच्याकडे मतं मागतो आहे, तुमच्या मतांचा जोगवा मागण्यासाठी दररोज दारोदारी फिरत आहे. तसेच मला निवडून दिलं नाही तर मी तुम्हाला शाप देईन”
दरम्यान, साक्षी महाराजांच्या या इशाऱ्यावरून आता विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र साक्षी महाराजांच्या या धमकीस मतदारांकडून कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.