नवी दिल्ली – युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे कोच फॅक्टीच्या खासगीकरणाचा विषय उपस्थित करताना तशा प्रयत्नांना आपला विरोध असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की या फॅक्टरीतील काही युनिट्सचे कॉर्पोटरायजेशन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पाच्या खासगीकरणाचेच हे पहिले पाऊल आहे असे त्या म्हणाल्या.
सध्या सरकारी मालमत्ता खासगी लोकांना कवडीमोल भावाने विकली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. शुन्य प्रहरात त्यांनी अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या म्हणाल्या की रायबरेलीच्या कोच फॅक्टरीतील काही युनिट्सचे कॉर्पोटरायजेशन सरकार करणार आहे. त्या शब्दाचा नेमका अर्थ लक्षात घेतला तर ही खासगीकरणाचीच पहिली पायरी आहे असा आरोप त्यांनी केला.तथापी रेल्वे मंत्रालयाने यावर खुलासा करताना म्हटले आहे की ही फॅक्टरी सरकारच्याच ताब्यात राहणार आहे.
कॉर्पोटरायजेशन म्हणजे खासगीकरण नव्हे असे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या सरकारच्या काळात ही फॅक्टरी रायबरेलीत सुरू झाली आणि आज तेथे देशातील रेल्वेचे सर्वोत्तम कोच अत्यंत स्वस्तात तयार होतात असे सोनिया गांधी यांनी यावेळी नमूद केले. ही फॅक्टरी उभारण्यासाठी सरकारने तेथे मोठा पैसा खर्च केला आहे तेथे आता सरकार कॉर्पोटरायझेशन करू पहात आहे. सरकारच्या या धोरणामुळे तेथे काम करणाऱ्या दोन हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी झाले आहे असेही त्या म्हणाल्या. हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत संचार निगम लि अशा सरकारी कंपन्यांचे अस्तित्वही सरकारच्या धोरणामुळे धोक्यात आले आहे.