भाजपची मध्य प्रदेशातील लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आपल्या विवादित वक्तव्यांसाठी नेहमीच माध्यमांच्या प्रकाश झोतात असते अशातच आज पुन्हा एकदा साध्वी प्रज्ञा सिंगने आणखी एक विवादित वक्तव्य केलं असून यावेळी तिने थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याला देशभक्त ठरवले आहे.
दरम्यान याच पार्श्ववभूमीवर आता, भाजपने आपली लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले असून प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्या वक्तव्याबाबत बोलताना भाजपचे प्रवक्ते नरसिंह राव यांनी, “नथुराम गोडसे” देशभक्त आहेत आणि राहतील या प्रज्ञा सिंगच्या या विधानाशी भाजप सहमत नाहीये. आम्ही तिच्या विधानाचा निषेध करतो. तसेच पक्षातर्फे तिला या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात येईल, तिने या विधानासाठी सार्वजनिकपणे माफी मागितली पाहिजे.” अशी भूमिका मांडली आहे.
भाजपच्या लोकसभा उमेदवाराकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्याऱ्याला देशभक्त संबोधण्यात आल्याने काँग्रेसने भाजपवर चांगलाच निशाणा साधला असून काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी, “भारत मातेच्या आत्म्यावर गोडसेच्या उत्तराधिकाऱ्यांकडून हल्ला केला जात असून केंद्रातील भाजप सरकार म्हणजे गोडसेचे उत्तराधिकारी आहे. भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रपित्याच्या हत्याऱ्याला देशभक्त म्हंटले जात आहे तर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या करकरेंसारख्या थोर देशभक्ताला देशद्रोही ठरवले जात आहे.” असं वक्तव्य करत भाजपला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
तत्पूर्वी, चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी अर्वाकुरची येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी, “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता” असं वक्तव्य केल्याने मोठी खळबळ माजली होती.
कमल हसन याच्या वक्तव्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली असून भाजप नेत्यांकडून त्याच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. दरम्यान आता भाजपची विवादित लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिने थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याला देशभक्त ठरवल्याने नवा वाद उफाळून आला आहे. यापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंगने २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या हेमंत करकरेंना आपल्या शापामुळेच मरण आले होते असं विवादित वक्तव्य केलं होतं.
GVL Narasimha Rao, BJP on Pragya Singh Thakur's statement "Nathuram Godse was, is & will remain a 'deshbhakt": BJP does not agree with this statement, we condemn it. Party will ask her for clarification, she should apologise publicly for this statement. pic.twitter.com/yBEs8nQoWW
— ANI (@ANI) May 16, 2019