– अजित पवार यांची मागणी
मुंबई- मालाड येथे घडलेल्या दुर्घटनेला मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरून चौकशी करा. त्यांना जमत नसेल तर ही पालिका बरखास्त करून तेथे प्रशासक नेमा. तसेच दोषी बिल्डरांसह अधिकाछयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नसीम खान आदींनी मुंबई, पुण्यातील घटनांचा उल्लेख करत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा करण्याची मागणी लावून धरली. सरकार बेजबाबदारपणे वागत आहेत, हा निवडणुकीतील यशाचा उतमात चालू आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी या वेळी सरकारला धारेवर धरले. गेल्या चोवीस तासात कोंढवा येथे 15, पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट जवळ 6 लोकांचा, कल्याण मध्ये 3 लोकांचा आणि मालाडमध्ये 18 लोकांचा मृत्यू झालेला आहे.
बांधकाम व्यावसायिकांचा बेजबाबदारपणा आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा या गोष्टीला जबाबदार आहे. त्यामुळे मुसळधार पावसात किड्या मुंग्यासारखे माणसे मरू लागली आहेत, रेल्वे बंद पडली आहे, मालगाडी घसरली आहे, याला केवळ पाऊस जबाबदार नाही. यापूर्वी मुंबईत असा पाऊस पडला नव्हता काय, असा सवाल करत अजित पवार यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी केली.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार या सगळयांच्या मुखाशी आहे. आता थेट मातोश्रीच्या बाजूचा परिसर देखील जलमय झाला आहे. भाजपाने पहारेकऱ्याची जबाबदारी स्वीकारली होती.पण आता सत्ता टिकविण्यासाठी किती तडजोड करावी लागत आहे.शिवसेनेने करून दाखवल्याची त्यांची घोषणा “मुंबई भरून दाखवली’ अशी करावी असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रसचे गटनेते जयंत पाटील यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळी तसेच महापालिकेच्या कंट्रोल रूमला भेट द्यायला गेले आहेत. ते आल्यानंतर चर्चेला सुरूवात करू असे संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे म्हणाले. मात्र विरोधी आमदार आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.