मुंबई – यंदा महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला असून राज्यभरातील जनता पाणीप्रश्नाने अक्षरशः मेटाकुटीस आली आहे. अशातच आता दुष्काळाचा दाह भोगणाऱ्या राज्यातील जनतेसाठी जलसंधारण विभागाकडून आणखीन एक दुःखद बातमी आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, जलसंधारण विभागाने आपल्या संकेतस्थळावर आज महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी प्रसिद्ध केली असून या आकडेवारीद्वारे महाराष्ट्रातील तब्ब्ल २६ धरणांमधील पाण्याची उपलब्धता शून्य टक्क्याखाली पोहोचली असल्याचं उघड झालं आहे.
जलसंधारण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद, बीड, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद या ५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या औरंगाबाद विभागातील पाणीसाठा १८ मे च्या ताज्या आकडेवारीनुसार केवळ ०.४३% इतका आहे. गतवर्षी याच तारखेला औरंगाबाद विभागातील पाणीसाठ्याचं प्रमाण २३.४४% एवढं होतं.
पैठण, मंजरा, माजलगांव, येलदारी, सिद्धेश्वर, तेरणा, सिना कोलेगाव आणि धूदना या धरणांमधील पाणीसाठ्याने सध्या तळ गाठला असून जलसंधारण विभागाच्या आजच्या ताज्या आकडेवारीनुसार या धरणांमध्ये पाणीसाठ्याचे प्रमाण शून्य टक्के आहे.
गतवर्षी मे महिन्यात या धरणांमध्ये पैठण ३४.९५%, मांजरा २१.२४%, माजलगांव १७.५% आणि तेरणा ५२.०३% एवढं पाणी शिल्लक होतं मात्र यंदा ही पातळी शून्यापर्यंत आली आहे.
शून्य टक्के पाणी पातळी गाठलेल्या आणखीन धरणांमध्ये नागपूर विभागातील गोशीखुर्द, दीना आणि नंद, जळगा विभागातील अप्पर तापी हत्नूर, नाशिक विभागातील वाकी, भाम, भावली आणि पुणेगाव, पुणे विभागातील, दिबे, घोड, पिंपळगाव जोगे, वडाज आणि टेमघर, सोलापूर विभागातील भीम, कुंडली टाटा आणि लोणावळा टाटा या धरणांचा समावेश आहे तर नाशिकमधील तिसगाव धरण आणि नागपूरमधील तोतलाडोह येथे अनुक्रमे 0.01 आणि 0.08 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.