नवी दिल्ली – रेल्वे खात्याच्या पुरवणी मागण्यांवर संसदेत गुरूवारी मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली आणि ही चर्चेची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की गुरूवारी रात्री 11 वाजून 58 मिनीटांपर्यंत ही चर्चा सुरू होती.
गेल्या अठरा वर्षांनंतर प्रथमच इतका वेळ लोकसभेचे कामकाज सुरू होते. गुरूवारी दुपारी सुरू झालेल्या चर्चेत सुमारे शंभर खासदारांनी भाग घेतला. यावेळी विरोधी खासदारांनी मोदी सरकारच्या कामकाजावर तुफानी टीका केली.
रेल्वेच्या अडचणी सोडवण्याऐवजी मोदी सरकारने रेल्वच विकायला काढली आहे. रेल्वेच्या खासगीकरणाला आमचा सक्त विरोध असेल अशी टीका तृणमुल कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी यावेळी केली. बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पांची स्वप्ने दाखवून मोदी सरकार लोकांना स्वप्न विकत आहे असे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
भाजप सदस्यांनी मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली रेल्वे अधिक चमकदार कामगीरी करीत असल्याचा दावा यावेळी चर्चेत भाग घेताना केला. मोदी सरकारच्या काळात रेल्वेच्या अपघातांचे प्रमाण 73 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा भाजपचे सदस्य सुनिलकुमार सिंग यांनी केला.