विठ्ठल वळसेपाटील
वृक्ष वल्ली आम्हां सोयरें वनचरें । संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून झाडे, पशु व पक्षी हे सोयरे आहेत त्याचे उत्तम विवेचन केले आहे. आदर्श पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष, वनचरें व पक्षी यांचे महत्त्व विशद केले आहे. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र हे 3.07 लाख चौ.कि.मी. आहे. राष्ट्रीय वननीतीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्क्यांपर्यंत वनाच्छादन हवे. राष्ट्रीय वननीतीनुसार 93 हजार 248 चौ.कि.मी.चे क्षेत्र वनासाठी पाहिजे. सध्या ते 61 हजार 570 चौ.कि.मी. आहे. पशुपक्ष्यांना आपल्या हक्काचे वास्तव्य राहिले नाही. 14 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय स्थलांतर पक्षीदिन आहे. त्यानिमित्त पक्ष्यांचे महत्त्व आदर्श वने निर्मितीसाठी जाणून घ्यावे लागणार आहे .
महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा वाढत असून त्याचा फटका 8 मे रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील दहिवड-दिघवड गावात पुरेसे अन्न व पाणी न मिळाल्याने व वाढत्या तापमानामुळे 40 राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचा मृत्यू झाला आहे. ही बाब अतिशय खेदजनक आहे. अनेकदा राज्यात वेगवेगळ्या पक्ष्यांचे तसेच वाघ, बिबट्या व तरस आदी प्राण्यांचे अन्न शोधताना अपघाती किंवा उपासमारीने मृत्यू झाल्याचे वाचनात येते. पण त्याकडे शासन व सुज्ञ नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. निसर्गाबाबत आस्था उरली नाही. सध्या घराच्या छपरावर व जंगलात पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवणारी अनेक निसर्गप्रेमी मंडळी आहेत. तरी पण याचा लाभ सर्वत्र होत नाही त्यामुळे अनेक प्राणी मृत होत आहेत.
भारत स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या 33 कोटी च्या घरात होती. आज ती चौपट म्हणजे 135 कोटी झाली आहे. लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली; पण जमीन मात्र तेवढीच राहिली. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेत भूमाफियांनी जंगल, टेकडी, माळरान यांबरोबर गावागावांतील गायरानांची लचके तोड केली. त्यावर सिमेंटची जंगले उभी केली. याशिवाय पाणथळीच्या जागा, नैसर्गिक स्रोत नष्ट करत त्यावर अतिक्रण केले. त्यामुळे पशुपक्ष्यांचा आधिवास नाहीसा झाला.
पाणथळीच्या जागी तळी, तलाव, नाले, ओढे अशा ठिकाणी अतिक्रमण झाल्याने तेथील पाणवनस्पती, मृदू शरीर जीव, शंख शिंपले, खेकडे व जलचर कीटक नाहीसे झाले. त्यामुळे त्यावर जगणारे लहान पक्षी तेथून स्थलांतरित झाले व हळूहळू त्यांची संख्या घटत गेली. पाणथळीच्या जागेवरील काटेरी झुडपे, रानफुले, झाडे तोडली गेल्याने पक्षी, फुलपाखरे, कीटक नाहीसे झाले. याशिवाय मध गोळा करणारी मधमाशी नाहीशी झाली तसेच डोंगर पठारावर वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे गवताळ माळरान नष्ट झाले. अनेक झाडी, झुडपे, काटेरी झाडे, औषधी वनस्पती नष्ट झाली. त्यामुळे तेथील सरडा, घोरपड, खवलेमांजर, खोकड, ससा असे सरपटणारे लहान प्राणी तसेच गवतात अंडी घालून प्रजनन करणारे पक्षी नाहीसे झाले. सध्या पश्चिम महाराष्ट्रातून माळढोक पक्षी नाहीसा होत चालला आहे.
पूर्वी वटवृक्ष असल्याने या झाडावर अनेक पक्ष्यांचे थवे दिसत असत. रानात वाढणारी वड, पिंपळ, चिंच, लाख, साग, साल, कदंब, कवठ, मोह, बाभुळ अशी अनेक देशी झाडे जाऊन विदेशी झाडे आली. या विदेशी झाडांना फुले, फळे, शेंगा येत नाहीत. त्यामुळे हमखास मिळणारे अन्न नाहीसे झाले. त्यामुळे माकडासारखा प्राणीही नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. गर्द दाट झाडी नाहीशी झाल्याने मोरांची संख्याही वेगाने कमी होत आहे. त्याबरोबरच पोपट, सुतार पक्षी, बगळे, कोकीळ, कावळा, चिमणी हे रोजच्या पाहण्यातील पक्षी नजरेआड झाले आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलतोड तसेच शेतीचे विस्तारीकरण, नगदी पिके, फळबागा, तरकारी शेती करण्यात वाढ झाली. परिणामी धान्य पीक शेती कमी झाली. याचा फटका मात्र अन्न शोधणाऱ्या पक्ष्यांना झाला. यातून ढोक, मैना, साळुंखी, भारद्वाज, कोकीळ, कौंच, गरुड, ससाणा, घार, गिधाड, घुबड याबरोबरच धीवर, सुगरण, करकोचा, पिंगळा, बुलबुल, पारवा, पावशा, नीलकंठ, पाणथळीच्या काठी पाणकोळी, पाणकोंबडी, पाणकावळा, बदक, टिटवी असे देशी पक्षी दुर्मीळ झाले तर काहींचे अस्तित्व नष्ट झाले आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल अधिक ढासळत चालला आहे.
भारतात अनेक ठिकाणी परदेशी पक्षी येत असतात. पृथ्वी कलण्याचा काळ ऋतू बदल होत असताना उत्तरेकडील गोठवणाऱ्या थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ते उष्ण कटिबंधीय प्रदेशात हजारो किलोमीटरचा प्रवास करत दोन ते अडीच महिने स्थलांतरित होत असतात. अशावेळी अनेक पर्यटक अशा स्थळांना भेट देत असतात; परंतु त्यांच्या संवर्धनाचा मात्र विचार होत नाही. महाराष्ट्रात कर्नाळा येथ पक्षी अभयारण्य आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्राणी व पक्ष्यांसाठी वने राखीव आहेत; परंतु मोकळ्या वातावरणात त्यांच्या अस्तित्वाला मात्र धोका निर्माण झाला आहे.
भारत विकासाच्या दृष्टीने औद्योगिकीकरणाची झेप घेत असताना निसर्गाकडे मात्र दुर्लक्ष झाले. अनेक कारखान्यांनी कधी पर्यावरणाच्या दृष्टीने भरीव कामे केली नाहीत. अफाट जंगलतोड, वाढते तपमान यामुळे केवळ मनुष्याचे नव्हे तर पशुपक्षी यांनासुद्धा मोठा फटका बसला आहे. जगविख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली व वनव्रतस्थ लेखक मरुती चितमपल्ली यांनी आपले जीवन जंगल व पशुपक्ष्यांसाठी वाहिले. त्यांच्या साहित्यातून हे वास्तव लक्ष्यात येते की मानवी जीवनात संतुलित पर्यावरण व पशुपक्ष्यांना किती अनन्यसाधारण महत्त्व आहे.