नवी दिल्ली: भारत आणि बांगलादेश यांच्यात सीमा दलाच्या महासंचालक पातळीवरील 48 वी चर्चा पुढील आठवड्यात ढाक्यात होणार आहे. त्यात दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागातून होणारी घुसखोरी, स्मगलिंग, इत्यादी महत्वाच्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आर. के मिश्रा हे दहा जणांच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या शिष्टमंडळाचा पाच दिवसांचा दौरा येत्या 11 जून पासून सुरू होईल.
भारतीय शिष्टमंडळात गृहमंत्रालयातील अधिकारी, मादकद्रव्य विरोधी विभागाचे अधिकारी, तसेच ढाका येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकारी सहभागी होतील. मुख्य चर्चा 11 जून ते 15 जून या अवधीत होईल. बांगलासीमेवरून गुन्हेगारांच्या टोळ्यांची सर्रात ये जा सुरू असते आणि या टोळ्यांनी सीमा सुरक्षा दलांच्या जवानांवर हल्ले केल्याच्याही काही घटना मध्यंतरीच्या काळात घडल्या आहेत. तो विषय यावेळी भारतीय शिष्टमंडळाकडून प्रामुख्याने उपस्थित केला जाईल असे सांगण्यात येते. या चर्चेत बांगलादेशाचे 19 सदस्यांचे शिष्टमंडळ सहभागी होत असून त्याचे नेतृत्व बांगलादेशचे बीजीबीचे महासंचालक मेजर जनरल महंमद शफीनुल इस्लाम हे करतील.