श्रीरामपूर – श्रीरामपूर बस आगारामध्ये रात्री 9 वाजता सुटणारी श्रीरामपूर – मुंबई शिवशाही बसच्या वेळेत बदल करुन तिची वेळ सायंकाळी 7 ची केल्यामुळे प्रवाशांत नाराजी निर्माण झाली आहे. श्रीरामपूर- मुंबई शिवशाही बस सुटण्याची वेळ सायंकाळी 7 वाजता केल्यामुळे ही बस मध्यरात्री 2 वाजता सेंट्रल बसस्थानकावर पोहचणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्रीच्यावेळी घरी किंवा लॉजवर जाण्यास साधन मिळणार नाही. मिळालेतर दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे. अन्यथा प्रवाशांना पहाटेचे 5 वाजेपर्यंत सेंट्रल बसस्थानक मुंबई येथे दिवस उजाडण्याचे वाट बघत बसावे लागणार आहे.
या वेळेत बदल का केला याचे निश्चित कारण समजू शकत नाही. रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान बसस्थानक समोरून खासगी बस जातात. त्यांच्या सोयीसाठी बसस्थानक प्रमुखांनी बसच्या वेळेत बदल केला असावा, अशी चर्चा प्रवाशांमध्ये आहे. बसस्थानक प्रमुख शिवदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही. अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता या बसला रात्री नाशिकचे पुढे प्रवासी मिळत नाही त्यामुळे वेळ बदलली असे सांगितले. श्रीरामपूर- मुंबई बस (लालपरी) ही रात्री 9 वाजता जात असे, परंतू ती बंद करुन शिवशाही बस सुरु केली. या बसचे मुंबईचे भाडे प्रवाशांना परवडत नसल्यामुळे प्रवासी मिळत नाही. श्रीरामपूर बसस्थानक प्रमुखांनी श्रीरामपूर-मुंबई बस पुर्ववत रात्री 9 वाजता सोडावी, अशी मागणी प्रवाशांची असून प्रवासी संघटनेने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अन्यथा बसस्थानक प्रमुखाचे मनमानीविरुध्द आंदोलनाचा इशारा दिला आहे.