चेन्नई : आयपीएलचा बारावा मोसम रंगात आला असून यंदाच्या मोसमात चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चीत झाले असून इंग्लंडमध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये विश्रांती देण्याची गरज आहे, असे मत माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.
धोनीला पाठदुखीचा त्रास होत असून, कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीदरम्यान त्याला पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत विश्रांती देण्यात आली होती. या विषयी बोलताना श्रीकांत म्हणाले की, विश्वचषक स्पर्धा महत्वाची आहे.
त्यामुळे धोनीला आयपीएलच्या एक ते दोन लढतींमध्ये विश्रांती देण्याची गरज आहे, विश्वचषक स्पर्धेपूर्वी त्याचा पाठदुखीचा त्रास दूर झाला पाहिजे, नाही तर भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत आठ सामन्यांमधील सहा डावांमध्ये एकूण 230 धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.