नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताला पराभवाचा सामना करत या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेचा भडीमार सुरू झाला आहे. त्यातच आता संघात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले असल्याचे दिसत आहे. यासर्व परिस्थितीत, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या पराभवाला धोनीच जबाबदार असून, त्यानेच मुद्दाम भारताला हरवले असल्याचे गंभीर आरोप योगराज सिंह यांनी केले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. यावेळी योगराज यांनी युवराज क्रिकेटमधून लवकर निवृत्त होण्यामागे धोनी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आपण धोनीची पोलखोल करणार असल्याचेही योगराज सिंह म्हणाले होते. त्यानुसार योगराज सिंह यांनी धोनीवर टीकेची राळ उठवली आहे. रवि शास्त्री आणि महेंद्रसिंह धोनी यांना या विश्वचषकामध्ये युवराज सिंह नको होता त्यामुळे त्याला संघात घेतले नसल्याचे सांगत योगराज सिंह यांनी म्हटले. तसेच विश्वचषक जिंकण्याचा रेकॉर्ड केवळ आपल्याच नावावर रहावा म्हणून धोनीने सामना हरला असल्याचाही गंभीर आरोप योगराज यांनी केला आहे.