बारामती – लोकसभा निवडणूक पार पडली; परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र लागू केले नाही तर उरलेल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. 13 ऑगस्ट रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनानिमित्त महाराष्ट्रातील तहसील कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन करून सरकारला इशारा धनगर समाज देणार आहे. दरम्यान, प्रमाणपत्र लागू करावे, अन्यथा नागपूर येथे अंतिम ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे कल्याणी वाघमोडे यांनी सांगितले.
सकल धनगर समाजाची चिंतन बैठक मंगळवारी (दि. 16) बारामती येथे पार पडली त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आला. यावेळी डॉ. ईश्वर यमगर, नवनाथ पडळकर, सुधाकर पांढरे, गोविंद देवकाते, प्रकाश देवकाते, मंजुळा रुपनवर, मंदाकिनी घुले, सुनीता पिंगळे , आप्पासो कोळेकर, गणपत देवकाते, पोपट धवडे, सागर देवकाते, ऍड. सतीश मासाळ, मोहन ठोंबरे आदी बांधव उपस्थित होते.
कल्याणी वाघमोडे म्हणाल्या की, स्वातंत्र्यापूर्वी पासूनचे एस.टी. प्रवर्गाचे सर्व पुरावे धनगर समाजाकडे आहेत, ते राज्य सरकार व न्यायालयाकडे जमा केले आहेत; परंतु फक्त वेळकाढू धोरण राबवत सरकारने धनगर समाजाला अजूनपर्यंत न्याय दिलेला नाही. विधानसभा व विधानपरिषद शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये आरक्षणावरून गदारोळ पहावयास मिळाला आणि शेवटी अनेकदा सभागृह तहकूब करावे लागले. धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागायला हवा परंतु, सरकारकडून वेळकाढू व कुचराईपणा होताना दिसत आहे, हे स्पष्ट असल्याने आता “आर या पार’ची लढाई समाज बांधव लढणार आहे.