मतांच्या मोहापायी भाजपने विद्यार्थ्यांचाही बळी दिला
मुंबई: वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार होणार नाही. मतांच्या मोहापायी सरकारने विद्यार्थ्यांचाही बळी दिला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, भाजपकडे कोणत्याच गोष्टीचा लाँग टर्म प्लान नसतो. मग त्यांच्या फसलेल्या योजना असोत किंवा नुकतेच जाहीर झालेले मराठा आरक्षण. निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर केले मात्र त्याची ठोस अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला सरकारच जबाबदार आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. यावर्षीची प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार होणार नाही. कायदा होण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा करत काही विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती.