मुंबई – विमा कंपन्यांच्या एजंटनी शेतकऱ्यांना लुटलं आहे. समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार. तुमची ऑफिसेस मुंबईत आहे, शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत विमा कंपन्यांना दिला होता. त्यानंतर या विधानावरूनच राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.
धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, ‘गेल्या ५ वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत, तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत. शिवसेनेला मात्र निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.
शिवसेनला निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांची आणि त्यांची लुट करणाऱ्या पीक विमा कंपन्यांची आठवण येते. उद्धवजी शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, असेही मुंडे म्हणाले.