चिंचवड –“जय जय राम-कृष्ण-हरी’चा गजर करीत सुरू झालेली भक्तिरसाची दिंडी ज्ञानियांच्या राजा’चे आकाशाएवढे दर्शन घडवीत अनुपम सोहळ्यात रसिकांच्या चित्ती रममाण झाली. निमित्त होते ते स्वरसायली प्रस्तुत तुका आकाशाएवढा सांगीतिक कार्यक्रमाचे.
स्वरांगण योजनेतील दुसऱ्या पुष्पात रसिकांना ही अनोखी अनुभूती आली.
मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या सहकार्याने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम रंगला. गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि गायिका-अभिनेत्री सायली राजहंस-सांभारे यांनी रचना सादर केल्या. तर अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे निरूपण केले. तुकोबांच्या संतत्वाचा जीवनप्रवास या संगीतमय कार्यक्रमातून उलगडला.
“ज्ञानियांचा राजा गुरू महाराज’, “आनंदाचे डोही’, “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, “आता कोठे धावे मन’, सुंदर ते ध्यान’, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’, “पद्मनाभा नारायणा’, “आम्हा घरी धन’, “अवघा तो शकुन’, “कमोदिनी काय जाणे’, “खेळ मांडियेला’, “राजस सुकुमार’, “जेथे जातो तेथे’, “जे का रंजले गांजले’, “आम्ही जातो अमुच्या गावा’, “अणुरणीया थोकडा’ या रचनांमधून संतत्वाचा जीवनप्रवास उलगडला. गायक कलाकारांना मिलींद कुलकर्णी, भरत कामत, अनय गाडगीळ, ओंकार दळवी, आदित्य आपटे यांनी साथसंगत केली. संहिता लेखन दिग्पाल लांजेकर यांचे होते.