पुणे – नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर तुफान हल्ला चढवत गोदावरी पाणीप्रश्नवरून त्यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, राज ठाकरेंनी अभ्यास करुन बोलावं. ते म्हणतात महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातला जाणार आहे. मात्र हा करार 2010 साली अशोक चव्हाणांनी केला होता. गुजरातला पाणी देण्याचा करार त्यांच्या काळात झाला. पण या पठ्ठ्याने, देवेंद्र फडणवीसने तो करार रद्द केला. महाराष्ट्राचं पाणी, मराठवाड्याचं पाणी मराठवाड्यालाच मिळणार, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
दरम्यान, काल नांदेड येथे झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोदावरी पाणी प्रश्नावरून टीका केली होती. ते म्हणाले होते की, महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडतोय आणि दुसऱ्या मार्गाने गुजरातला वळवत आहेत. आणि ह्यावर देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाही कारण हा तर बसवेलला मुख्यमंत्री.