पाचगणी – मी द्वेषाचे राजकारण करत नाही. त्यामुळे आपले वैचारिक मत घेऊन सर्वांच्या सहकार्याने मतदारसंघांचा विकास साधुयात असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.लोकसभेच्या विजयानंतर उदयनराजे यांनी पाचगणी परिसरातील मतदारांचा आभार दौरा केला. यावेळी पाचगणी पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात उदयनराजे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, युवानेते विकास शिंदे, विठ्ठल बगाडे, सचिन भिलारे, उज्ज्वला महाडिक, अर्पणा कासुर्डे, माजी उपसभापती मदन भोसले, वाहिवाटदार चंद्रकांत भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, आपले प्रश्न अडचणी समजून घेण्यासाठी मतदारसंघात मी लोकसभेच्या अधिवेशनानंतर आमसभा घेणार आहे. त्यामुळे लोकांची कामे वेगाने मार्गी लावता येतील. प्रास्ताविकात धोम धरणातून पाचगणी शहराला पिण्याचे पाणी उचलण्याची योजना मार्गी लावण्याचे साकडे उदयनराजेंना घातले. यावेळी विठ्ठल गोळे, मिलिंद कासुर्डे, रुपेश बगाडे, मेहुल पुरोहित, नागनाथ भोसले आदींसह नागरिक युवक उपस्थित होते.