श्रमाला निसर्गाची साथ मिळाल्यास हा शेवटचा दुष्काळ
पाणी फाउंडेशनने गावाला दिलेले श्रमदान व यांत्रिकीकरणाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यासाठी महिला व पुरुष तरुण मुले मुली यांनी मोठ्या प्रमाणावर उत्साहात श्रमदान करत गाव दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
बिदाल – माण-खटाव हे दोन्ही तालुके कायम दुष्काळी म्हणूनच संबोधले जातात. मात्र गत काही वर्षांपासून या तालुक्यांमध्ये उभ्या राहिलेल्या जलधसंधारणाच्या चळवळीने दुष्काळाची दाहकता कमी झाली आहे. माण तालुक्यातील दोरगेवाडी हे गावदेखील दुष्काळग्रस्त. मात्र आता येथील ग्रामस्थांनी गावात जलसंधारणाची चळवळ उभी करत गाव पाणीदार करण्यासाठी चांगलीच कंबर कसली असून तसा निर्धार केला आहे. माण तालुक्यातील जनतेला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिथे पिण्याला पाणी नाही तिथे शेतीची काय अवस्था असणार? त्यामुळे येथील शेकडो कुटुंबे मेंढपाळ, माथाडी कामगार, दरवर्षी स्थलांतरित होतात.
दुष्काळाचा इतिहास बदलण्यासाठी गावातील प्रमुख मंडळींबरोबर गावातील ग्रामस्थांनी राजकारण व गट तट बाजूला करत यंदाच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत उतरून पाऊसाचे पडणारे पाणी अडवून या गावातील दुष्काळाला हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. या गावची लोकसंखा 689 असून कुटुंब संख्या 168, क्षेत्रफळ 803.73 एवढे आहे. सततच्या दुष्काळामुळे येथील स्थलांतर प्रमाण 60 टक्के आहे. येथील नागरिक मुंबई माथाडी कामगार व मेंढपाळ व्यवसायानिमित्त स्थलांतरित होतात. सध्या गावचा दुष्काळ हटवण्यासाठी गावातील अबाल वृध्द, महिला, पुरुष, लहान मुले सकाळी दोन श्रमदानात उत्साहाने सहभागी होत आहेत. ग्रामस्थांचा हा उत्साह दोरगेवाडी गावाला निश्चितच पाणीदार बनवणार आहे. या श्रमाला निसर्गाची साथ मिळाल्यास हा शेवटचाच दुष्काळ या गावात दिसणार आहे.
गावकऱ्यांकडू दररोज चहा, नाष्टा, जेवण करण्यास मदत केली जाते. आ. जयकुमार गोरे यांनी या गावाला पाणीदार करण्यासाठी, श्रमदान करत सर्वतोपरी मदत केली आहे. तर राज्याचे माजी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, अनिल देसाई ड्रीम फौंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा देशमुख, माणचे सुपूत्र व आयकर उपायुक्त डॉ. नितीन वाघमोडे, गजानन ठोंबरे, उद्योग उपसचिव नामदेव भोसले, नंदकुमार शिलवंत यांनी मार्गदर्शन करत मदतही केली
आहे.