जयंत पाटीलांचे सरकारला खुले आव्हान
मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या निकालावरून भाजप आणि शिवसेना विधानसभेच्या 220 जागा जिंकणार अशी चर्चा आहे. पण शिवसेनेसोबत युती झाली नाही तर भाजप महाराष्ट्रात 160 जागा जिंकणार असेही बाहेर बोलले जात आहे. पण ईव्हिएम मशिनबाबत लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे सरकारमध्ये हिंमत असेल तर आगामी विधानसभेची निवडणूक ईव्हिएम ऐवजी मतपत्रिकेवर घेऊन दाखवावी, असे खुले आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत दिले.
सोमवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सरकार चौफेर टिका करतानाच आगामी विधानसभेची निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याचे सरकारला आव्हान दिले. ईव्हिएमबाबत लोकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा, तसा ठराव करा… म्हणजे दुध का दुध…पाणी का पाणी होऊन जाईल, असे सांगतानाच तसे झाले तर कोण कोणत्या बाजुला बसतो ते नंतर दिसेल, असे पाटील म्हणाले. आगामी निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवल्यास आमच्याकडून तुमच्याकडे आलेले राधाकृष्ण विखे-पाटील हे पुन्हा आमच्या बाजुला बसलेले दिसतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
जयंत पाटील यांचे भाषण सुरु असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारला कोपरखळी मारली. विधानसभा निवडणूकीत भाजपालाच बहुमत मिळणार अशी बाहेर चर्चा असल्याचे जयंत पाटील यांनी सांगताच निवडणुकीनंतर आम्हाला किमान एक अँग्लो इंडियन आमदाराची तरी जागा ठेवा असे भुजबळ म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून एका जागेवर आमदाराची नियुक्ती करण्यात येते. किमान ती एक तरी जागा आमच्यासाठी ठेवा, असा टोला भुजबळ यांनी भाजपाला मारला.