पिरंगुट – मुळशी तालुक्यात मुसळधार पावसाने खाचरे भरली त्यातून 50 टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खाचरे कोरडी पडू लागली असून यातून तालुक्याच्या भात उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असा अंदाज युवा शेतकरी व कृषिमित्र गणेश पवळे यांनी व्यक्त केला आहे.
मुळशी तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तालुक्यात भात लावणीची कामे रखडली आहेत. बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
मुळशीत जून व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला. यामुळे बळीराजाने भात लावणीस सुरुवात केली होती. मात्र, गेल्या आठवडाभर पाऊस गायब झाला. अगोदर पडलेल्या पावसामुळे भात खाचरे तुडूंब भरली होती, त्यामुळे चिखल करून लावणीस वेग आला होता. तालुक्याच्या सर्व भागात भात लावणी सुरू झाली होती.
सध्या, तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने भात खाचरातील पाणी आटले आहे. भात लावणीसाठी पाणी कमी पडू लागली आहे. परिणामी, भात लावणीची कामे रखडली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. बळीराजा आभाळाकडे नजर लावून पावसाची वाट पाहत बसला आहे. तालुक्यात सर्वत्र पाऊस पूर्णपणे उघडला आहे. त्यामुळे भात लावणीस उशिरा होत आहे.