कुडाळ – निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलणार असल्याने मतदारसंघातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने वेळ आलीच तर मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. माझ्या पक्षप्रवेशासंदर्भात कोणी काय म्हणत असेल पण मी कोणताही वेडावाकडा निर्णय घेऊन जावळीच्या स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही. आपण सर्वजण आपल्या ताकदीने निवडणूक लढवू, येणाऱ्या निवडणुकीत कोणीही गाफिल राहू नका व आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना केल्या.
म्हसवे जिल्हा परिषद गटातील विविध गावांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून मंजूर कामांचे भूमीपूजन तसेच पूर्ण विकास कामांची उदघाटने व कार्यकर्ता मेऴावा असा संयुक्त कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, “”माझ्या घराण्यात पंधरा वर्षे मंत्रिपद होते, त्यामुळे सत्तेची मला हाव नाही. सत्तेपेक्षा जनता हीच माझी खरी ताकद आहे. सातारा जावळीतील जनतेसाठी विकास कामांत कोठेही कमी पडलेलो नाही व यापुढेही कमी पडणार नाही.”
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी लोकसा निवडणुकीतील जावळीतील शिवसेनेचे मताधिक्य नगण्य असल्याचे त्यांनी सांगितले, शशिकांत शिंदेंनी कोरेगावमधूनच लढावे, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी माजी सभापती सुहास गिरी, उपसभापती दत्ता गावडे, अरुणा शिर्के, जावळी बॅंकेचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे, सदस्या अर्चना रांजणे, सौरभ शिंदे, विजय सुतार, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, जयदीप शिंदे, ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, डॉ. सुरेश शेडगे, तानाजी शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप परामणे यांनी केले. नितीन गावडे यांनी आभार मानले.