नवी दिल्ली – गेल्या काही तिमाहीत कर्जपुरवठा मंदावला आहे, ही बाब चिंतेची असल्याचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. विशेषतः लघुउद्योगांना वेळेवर कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचा ताळेबंद कोलमडतो असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आगामी काळात लघुउद्योगांना वेळेवर कार्यक्षमरीत्या कर्जपुरवठा करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. निर्यातदारांनाही कर्जपुरवठा कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विशेषत: छोटे उद्योग निर्यात करतात. त्यांना वेळेवर भांडवल पुरवठा होण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्या कामकाजावर परिणाम होतो असे ते म्हणाले.
भांडवल पुरवठा सुरळीत पुरवठा झाल्यानंतर निर्यातदारांनी किंवा उद्योजकांनी सरकारवर इतर सवलतींसाठी अनुदानासाठी दबाव आणू नये. व्यावसायिकरितीने त्यांनी आपले उद्योग वाढवावे. त्याचबरोबर निर्यात करावी. हे सर्व काम पारदर्शकतेने करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी आणि इतर कायदेविषयक सुधारणा केलेल्या आहेत. आगामी काळातही अशा प्रकारच्या सुधारणा केंद्र सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेवर अवलंबून राहू नये या उद्योगांनी विविध क्षेत्रांत निर्यात करण्याची गरज आहे त्यासाठी सरकार सहकार्य करील.