वडगाव मावळ/टाकवे बुद्रुक – भावकीतील विवाह सोहळा अटोपून घरी परतणाऱ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला. दिवसभर लग्नात मिरवणाऱ्या भावाचा अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर शोककळा पसरली. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रविवारी (दि. 5) रात्री नऊच्या सुमारास कान्हे फाट्याजवळ ही घटना घडली.
संदीप अर्जुन जाधव (वय 32, रा. कशाळ ता. मावळ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, कशाळ येथील संदीप जाधव यांच्या भावकीतील रविवारी कामशेतच्या गुरुदत्त मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. सकाळी साखरपुडा, हळदी समारंभ आणि सायंकाळी हा विवाह पार पडला. संदीपचे वडील कशाळचे माजी उपसरपंच अर्जुन जाधव हे देखील मागील तीन वर्षांपासून अंथरुणावर पडून आहे.
विवाह सोहळा झाल्यावर कन्यादान व अन्य धार्मिक विधी झाल्यावर नववधू वरांसह वऱ्हाडी मंडळी माघारी निघाली. लग्नात मिळालेले फर्निचर, भांडी, कपाटे संदीपने भावकी व मित्राच्या मदतीने टेम्पोतून घरी पाठविले आणि तोही दुचाकीवरून निघाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनांनी त्याला जोरात धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे वडील, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.