आंबेगाव – आंबेगाव खुर्द परिसरातील जांभूळवाडी तलावाला मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा विळखा बसला आहे. त्यामुळे तलावातील जलचर प्राण्याचा जीव धोक्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी प्रदूषित पाणी व तीव्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे पाण्यावर तरंगत होते. मेलेल्या माशांमध्ये लहान प्रजातींचा जास्त समावेश आहे.
तलावाच्या कडेला मोठ्या प्रमाणात मेलेल्या माशांचा खच साठल्यामुळे डुकरे, कावळ्यांचे प्रमाण तलावाभोवती वाढले आहे. तसेच, वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर यावर अवलंबून असणारा मत्स्य व्यवसाय धोक्यात येणार आहे.
शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी, या उद्देशाने या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या काही काळात परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे.तसेच, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांबुळवाडी रोडचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन शेती शिल्लक राहिली नाही. या भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे तलावाचे प्रदूषण होत आहे. तलावशेजारी असलेल्या अनेक मोठ्या सोसायटीचे मैलापाणी तलावात सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित होत असून त्याचा फटका जलचर प्राण्यांना बसत आहे.
तलावात केवळ 30 ते 40 टक्के पाणीसाठा
आंबेगाव खुर्द व जांभुळवाडी पाझर तलावाची निर्मिती रोजगार हमी योजनेअंतर्गत केली गेली असून साधारण 95 आर जमिनीमध्ये तो पसरलेला आहे. पावसाळ्यात या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असतो. तसेच, तलावाच्या खालील बाजूस विहिरी पाडून आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. हा पाझर तलाव असल्यामुळे व उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तलावातील पाणीसाठा कमी होत आहे. तसेच, पाझर तलाव असल्यामुळे सभोवतालच्या परिसरात पिण्याचे पाणीही प्रदूषित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सद्या तलावात केवळ 30 ते 40 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे आताच या पाण्याचे नियोजन केले पाहिजे, अन्यथा ऐन उन्हाळ्यात तलाव कोरडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी या गावांच्या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे तलावाचे प्रदूषण होत आहे. तलावाशेजारील अनेक मोठ्या सोसायटींचे मैलापाणी तलावात सोडले जात असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित होत असून जलपर्णी वाढत आहेत. तसेच, पाण्यातील जलचरही नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. येथील काही भागांत ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम चालू आहे. परंतु, तलावाचा परिसर मोठा असून तलावाचे प्रदूषण थांबवण्यासाठी सर्वच बाजूने ड्रेनेजलाईन टाकण्यात यावी.
– प्रसाद जगताप, ग्रामपंचायत सदस्य, आंबेगाव खुर्द