तिसऱ्या टप्प्यात अमित शहा आणि राहुल गांधी रिंगणात
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या (मंगळवार) महाराष्ट्रासह देशभरातील 116 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. जागांचा विचार करता तिसरा टप्पा सर्वांत मोठा ठरला आहे. त्यामुळे त्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाबाबत मोठी उत्सुकता आहे.
तिसऱ्या टप्प्यात मतदानाला सामोरे जाणारे मतदारसंघ 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. त्या टप्प्यात गुजरात (26 जागा) आणि केरळ (20 जागा) या दोन राज्यांमधील सर्व मतदारसंघांत मतदान होईल. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद होणार आहे. शहा गुजरातच्या गांधीनगरमधून तर राहुल केरळच्या वायनाडमधूून रिंगणात उतरले आहेत. तिसऱ्या टप्प्यात निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या जागांवरील उमेदवार निवडून देण्यासाठी 18 कोटींहून अधिक मतदार पात्र आहेत. त्या टप्प्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.
पहिल्या दोन टप्प्यांत 11 आणि 18 एप्रिलला अनुक्रमे 91 आणि 96 जागांसाठी मतदान झाले. त्या टप्प्यांत चांगले मतदान झाले. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यांतही मतदार त्यांचा हक्क बजावण्यासाठी उत्साह दाखवतील, अशी आशा आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. त्यासाठी सात टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया होणार आहे.