भोपाळ – देशाच्या विविध भागात काल वादळी पावसामुळे मोठे नुकसान होऊन जीवीत हानीही झाली आहे. त्यावर पहिल्यांदा ट्विट करताना पंतप्रधान मोदींनी या आपत्तीत गुजरात मध्ये ज्या लोकांचे बळी गेले आहेत त्या मृतांच्या नातेवाईकांना मोदींनी प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली होती. त्याला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जोरदार आक्षेप घेतला. कमलनाथ यांनी म्हटले होते की मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान नाहींत तर साऱ्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी केवळ गुजरातचेच हित पाहू नये आमच्याही राज्यात वादळी पावसाचे अनेक बळी गेले आहेत त्यांनाही मोदींनी मदत जाहीर करायला हवी अशी मागणी त्यांनी केली.
त्यानंतर पंतप्रधानांनी सुधारीत ट्विट करून सर्वच राज्यांतील मृतांना प्रत्येकी दोन लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली. नंतरचे सुधारीत ट्विट खुद्द मोदींनी केलेले नाही तर पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. आमच्या राज्यातही माणसेच राहातात. येथे तुमचे सरकार नाही म्हणून तुम्ही आमच्या राज्यातील जनतेवर अन्याय करणार आहात काय असा सवाल कमलनाथ यांनी केला होता. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करीत सर्वच मृतांना मदत जाहीर केली आहे.