नगर – 1979-80 च्या दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड.रामराव आदिक होते, त्यावेळी पक्षाकडे केंद्रात आणि राज्यात सत्ता नव्हती, अत्यंत खडतर काळ तो होता, पण सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाने सर्वच सत्ता पुन्हा स्थापन करुन राज्यात परिवर्तन केले.
त्यानंतर माजी मंत्री प्रा.असीर आणि नेते गोविंदराव आदिक यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पक्षात नवचैतन्य निर्माण केले. तीच परंपरा स्थापित करण्याची संधी आपणासर्वांना प्राप्त झाली आहे. सामान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्षाला पूर्वीचे वैभव मिळवून देऊ, अशी ग्वाही नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष व विधी मंडळाचे नेते, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात (मंत्रालयाजवळ) पदग्रहण समारंभ गुरुवारी (दि.18) आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. हा शानदार सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रभारी मलिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नवे कार्याध्यक्षांसह प्रदेश पदाधिकारी, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पा., आ.डॉ.सुधीर तांबे पा., संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे पा., श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, आ.भाऊसाहेब कांबळे आदि सह अहमदनगर शहरातून शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष आ.थोरात यांना मावळते प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पदाची सूत्रे दिली. या प्रसंगाचे राज्यातून मुंबईत आलेल्या कॉंग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले.