नागपूर – लोकसभा निवडणुकांआधी मागील वर्षी वंचित बहुजन आघाडी देशात तिसऱ्या पर्यायाच्या रूपाने समोर आली. वंचित बहुजन आघाडीच्या सभांनाही मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला होता. निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर राज्याचे विशेष लक्ष होते. राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु, ४० लाख मते आपल्या पारड्यात घेऊन वंचित बहुजन आघडीने तिसरा पर्याय म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम नेता अससुद्दीन ओवैसी यांनी मिळून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. संपूर्ण राज्यभरातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे वंचित बहुजन आघाडी तिसरा पर्याय ठरण्याची शक्यता व्यक्त होत होती. आणि ठरलीही. औरंगाबादमधील उमेदवार इम्तियाज जलील हा एकमेव उमेदवार विजयी झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेता प्रकाश आंबेडकर यांनाही आपल्या मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. परंतु, राज्यभरातून वंचितच्या उमेदवारांनी १ लाखांपेक्षा अधिक मते मिळवली आहेत. यानुसार वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपला दबदबा निर्माण केल्याचे दिसून येत आहे. आंबेडकरी आंदोलनाचा गड मानला गेलेल्या नागपूर शहरावर वंचित बहुजन आघाडीचे विशेष लक्ष होते. परंतु, तेथे अपेक्षित मते मिळाली नाहीत. उमेदवार सागर डबरासे यांना २६ हजार १२८ मते मिळाली. मात्र, ती समाधानकारक नाही.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकांमध्ये तिसरा पर्याय ठरण्यास सक्षम झाली आहे. यामुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाआघाडीने वंचितकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभेच्या ७० जागांवर पाणी सोडावे लागेल.