नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर ठाम राहत आज राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे पत्र शेअर केले आहे. या पत्रामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला असून राजीनाम्याच्या कारणापासून ते भारताच्या भविष्याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
पात्राच्या सुरुवातीलाच त्यांनी लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या दारुण पराभवाची करणीमिमांसा करणे महत्वाचे असल्याचं सांगत या पराभवाला जबाबदार असणाऱ्या अनेकांनी राजीनामे देणे गरजेचं असल्याचं म्हंटलं आहे. ते म्हणतात पक्षाची पुनर्बांधणी करताना जर इतरांकडून राजीनामे घेतले व मी पराभवाची जबाबदारी झटकून राजीनामा दिला नाही तर ते इतरांवर अन्याय केल्यासारखे होईल.
या पत्राद्वारे राहुल गांधी यांनी संघ व भाजप संपूर्ण देशामध्ये एकच संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. आरएसएसचे देशातील संसदीय संस्था आपल्या ताब्यात घेण्याचे स्वप्न आता पूर्ण झाले असून त्यामुळे आपली लोकशाही कमजोर झाली असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे.
आपल्या जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत आपण काँग्रेसचा सैनिक आणि भारत मातेचा पुत्र म्हणून काम करणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केला आहे.