बागलकोट/ चिक्कोडी (कर्नाटक) – कॉंग्रेसला देशामध्ये “असहाय’ पंतप्रधान हवा आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून जनतेने देशात समर्थ सरकारसाठी मतदान करावे, असे जोरदार आवाहनही पंतप्रधानांनी केले. लोकसभेच्या निवडणूकांसाठी उत्तर कर्नाटकातील अखेरच्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी आज एका दिवसात दोन ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. देशात मजऊत सरकारच्या भूमिकेवर त्यांनी यावेळी विशेष भर दिला.
कर्नाटकातील सत्तारुढ एच.डी.कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष जनता दल आणि कॉंग्रेस यांच्या आघाडी सरकारकडून सूड आणि भावनिक आवाहनाचे कधीही न संपणारे नाटक सुरू असल्याचेही ते म्हणाले. दर काही दिवसांनी आणि महिन्यांनी कोणत्याही सभेत, पत्रकार परिषदेत भावना वाहत असतात. कॉंग्रेसला अशे “मजबूर’सरकारच आवडत असते. कॉंग्रेसला असाच “मजबूर’ मुख्यमंत्री आणि “मजबूर’ पंतप्रधानही हवा आहे, अशी टीका पंतप्रधानांनी कुमारस्वामी यांचा उल्लेख न करता केली.
कुमारस्वामींकडून लष्कराचा अवमान
देशाच्या प्रथा आणि परंपरांना बदनाम करण्यासाठी कॉंग्रेसकडून कोणतीही कसर ठेवली जात नाही. कॉंग्रेस आणि “जेडीएस’च्या सरकारकडून राष्ट्रवादाला विरोध, वंशवादाची जोपासना, मोदींना शिव्या घालणे या गोष्टीत कॉंग्रेस आणि”जेडीएस’मध्ये साधर्म्य आहे. कुमारस्वामी यांनी देशाच्या लष्कराच्या बाबत वापरलेली भाषा अयोग्य आणि देशाच्या नागरिकांनाही अमान्य आहे. कुमारस्वामी यांनी लष्कराचा अवमान केला असून या एकाच मुद्दयावरून संपूर्ण कुटुंबाला सार्वजनिक जीवनातून हटवले जायला हवे, असे मोदी म्हणाले.
मुंबई हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे नागरिक असल्याचे पाकिस्तानला मान्य करायला लावले जाईल, असे आश्वासन कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिले आहे. ते पाकिस्तानने कबूलही करूनही पाकिस्तानने भारतात बॉम्बस्फोट केले आणि अणूबॉम्बची धमकीही दिली. हे काय सरकारचे यश आहे का ? मात्र आता पाकिस्तानच “वाचवा, वाचवा’ असे ओरडत असल्याचे ऐकू येत आहे. अशी तुलना पंतप्रधानांनी केली.
व्होट बॅंकेला राग येईल, म्हणून पाकिस्तानमधील बालाकोटवर केलेल्या “एअरस्ट्राईक’ला जास्ती प्रसिद्धी मिळू नये, असा प्रयत्न कुमारस्वामींकडून होत आहे. कॉंग्रेस आणि “जेडीएस’ ची व्होटबॅंक आहे तरी कोणती, असा प्रश्नही पंतप्रधानांनी विचारला. जम्मू काश्मीरमधील “ऍफ्स्पा’ हटवला जाण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. देशद्रोहींना खुली सूट दिली जावी, यासाठीच कॉंग्रेस प्रयत्नशील आहे, अशी टीकाही पंतप्रधानांनी केली.
कर्नाटकातल्या 28 मतदारसंघांपैकी 14 जागांवर विजय मिळवण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपने कर्नाटकात 17 जागा जिंकल्या होत्या.