दोघांनी वारंवार आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी वारंवार आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप कॉंग्रेसने शनिवारी केला. एवढेच नव्हे तर, मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेतही त्या पक्षाने दिले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोदी आणि शहा यांच्याबरोबरच निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतांचे ध्रुवीकरण, प्रचारात सशस्त्र दलांचा वापर आणि मतदानाच्या दिवशी मिरवणुका अशा तीन आघाड्यांवर मोदी आणि शहांनी आचारसंहितेचा भंग केला. आचारसंहिता भंगाबाबत आम्ही केलेल्या तक्रारींवरून निवडणूक आयोगाने अनेक नेत्यांवर कारवाई केली. त्याचे आम्ही स्वागतही केले. मात्र, मोदी आणि शहा यांच्याविरोधात कारवाई का करण्यात आली नाही? ते आचारसंहितेच्या कक्षेबाहेर आहेत का, असे सवाल सिंघवी यांनी केले. मोदी आणि शहांबाबत निवडणूक आयोगाकडून डोळेझाक केली जात आहे. न्यायालयात जाण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्या पर्यायाचा वापर आम्ही करू शकतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.