नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या निधनामुळे लाडकी कन्या गमावल्याची भावना पक्षात आहे. दिल्लीच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या प्रभावी प्रशासक, दूरदृष्टी असणाऱ्या नेत्या काळाच्या पडद्याआड गेल्या, अशा शब्दांत मान्यवरांनी दीक्षित यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद: दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणूून दीक्षित यांचा कार्यकाळ देशाच्या राजधानीचा कायापालट करणारा ठरला. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दु:ख झाले.
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू: दीक्षित या उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात दिल्लीच्या विकासासाठी भरीव योगदान दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी: दिल्लीच्या विकासात दीक्षित यांनी उल्लेखनीय योगदान दिले. सभ्य नेत्या असणाऱ्या दीक्षित यांना प्रेमळ व्यक्तिमत्व लाभले होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग: दीक्षित यांनी विकासासाठी दिलेले योगदान दिल्लीतील जनतेच्या कायम स्मरणात राहील. त्या कॉंग्रेसच्या समर्पित नेत्या होत्या.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी: दीक्षित यांच्या निधनामुळे मला मोठाच धक्का बसला. नि:स्वार्थपणे कार्य करणाऱ्या दीक्षित या कॉंग्रेस पक्षाच्या लाडक्या कन्या होत्या.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत: दीक्षित यांच्या निधनामुळे कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. लोकनेत्या असणाऱ्या दीक्षित कायम स्मरणात राहतील.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल: दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कार्याचे आणि योगदानाचे स्मरण नेहमीच ठेवले जाईल.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी: मी पहिल्यांदा खासदार बनले त्यावेळी दीक्षित केंद्रीय मंत्री होत्या. माझ्याशी नेहमीच चांगले संबंध ठेवणाऱ्या दीक्षित यांची नेहमीच आठवण येईल.