सशस्त्र दलांच्या वापरावरून प्रचारबंदीची मागणी
नवी दिल्ली – कॉंग्रेसने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. प्रचारात मोदी सातत्याने सशस्त्र दलांचा उल्लेख करत आहेत. ती बाब आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे मोदींवर काही काळासाठी प्रचारबंदी घातली जावी, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली.
कपिल सिब्बल, जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला. मत मागताना मोदी सशस्त्र दलांचा उल्लेख करत असल्याची 10 उदाहरणे त्या शिष्टमंडळाने सादर केली. यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधातही तक्रार करण्यात आली. बंगळूरमध्ये 18 एप्रिलला मतदान केल्यानंतर सीतारामन यांनी अब की बार, फिर मोदी सरकार, अशी प्रतिक्रिया दिली. मतदान केंद्रावर अशाप्रकारची घोषणाबाजी करता येऊ शकत नाही. सीतारामन यांच्याशी संबंधित तो व्हिडीओ निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. त्याशिवाय, कॉंग्रेसने मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याविरोधात निवेदन दिले. मध्य प्रदेश कॉंग्रेसच्या चौकीदार चोर है या मोहिमेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून ते निवेदन देण्यात आल्याचे समजते.