निती आयोगाच्या बैठकीबाबत सल्लामसलत
नवी दिल्ली – कॉंग्रेस शासित राज्यांचे चार मुख्यमंत्री व कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज निती आयोगाच्या बैठकीत उपस्थित करायच्या विषयांबाबत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी सल्लामसलत केली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी कॉंग्रेस मुख्यालयात मनमोहनसिंग यांच्याशी चर्चा केली.
आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या विषयांबरोबरच देशातील घटलेल्या पाणी साठ्याबाबत यावेळी चर्चा झाली. पंजाबचे मुख्यमंत्री मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. ते निती आयोगाच्या बैठकीलाच अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. सर्व कॉंग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री भोजन समारंभाचेही आयोजन केले होते.
कॉंग्रेसशासित राज्यांच्या सरकारांनी आपआपल्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे त्या अनुषंगानेही निती आयोगाच्या बैठकीत या राज्यांना जादा आर्थिक सवलती मिळाव्यात याविषयीची मागणी रेटण्यावर यावेळी चर्चा झाली असे सांगण्यात येते.