नवी दिल्ली -चांद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर इस्त्रोच्या त्या मोहिमेवरून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहावयास मिळाले. त्या मोहिमेचे श्रेय कॉंग्रेसने घेण्याचा प्रयत्न केल्यावरून भाजपकडून पलटवार करण्यात आला.
कॉंग्रेसने अवकाश मोहिमांचे श्रेय पं.जवाहरलाल नेहरू आणि मनमोहन सिंग या पक्षाच्या दोन माजी पंतप्रधानांना दिले.
देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांनी 1962 मध्ये अवकाश संशोधनासाठी निधी उपलब्ध केला. नेहरूंनी दूरदृष्टी दाखवून उचललेल्या पाऊलाचे स्मरण करण्याची ही योग्य वेळ आहे, असे ट्विट कॉंग्रेसकडून करण्यात आले. मनमोहन सिंग यांनी 2008 मध्ये चांद्रयान-2 प्रकल्पाला मंजुरी दिल्याचेही त्या ट्विटमध्ये नमूूद करण्यात आले.
मात्र, श्रेय घेण्याची कॉंग्रेसची ती कृती भाजपला रूचली नाही. त्यातून संबंधित मुद्द्याला राजकीय आखाड्यात खेचण्याची कृती हीन पातळीवरची असल्याचे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले. चांद्रयानाचे प्रक्षेपण हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे संबंधित मुद्दा राजकीय पटलावर आणला जाऊ नये. मात्र, भविष्यातील नेतृत्व दृष्टीपथात दिसत नसल्याने महत्व टिकवण्यासाठी भूतकाळाचा आधार घेण्याची धडपड केली जाते. दुर्दैवाने कॉंग्रेसच्या बाबतीत तसे घडत आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.