कोल्हापूर, (प्रतिनिधी) – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांमधील नववा संशयित आरोपी असलेल्या शरद कळसकर याला कोल्हापूर “एसआयटी’ने अटक केली असून त्याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाय त्याच्याकडे हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या पिस्तुलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती अशी माहिती आज कोल्हापूर एसआयटीने कोर्टाला दिली आहे.
कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर एसआयटीने तपास करत यापूर्वी आठ आरोपींची नावे समोर आणली आहेत. यातील सात आरोपींना यापूर्वीच अटक दाखवली असून विनय पोवार आणि सारंग अकोळकर हे दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.
पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी कळसकर याने कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शरद कळसकर हा औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद तालुक्यातील केसापूर गावाचा रहिवाशी आहे.
कॉम्रेड पानसरे यांच्यावर गोळीबार झाला त्या घटनेच्या अगोदर पाच ते सहा दिवस जंभोटी, किणये ता. बेळगाव येथे झालेले प्रशिक्षण व त्या रात्री बेळगाव एसटी स्टॅंडवर कॉम्रेड पानसरे हत्येच्या कटाची झालेली बैठक याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास करून त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेली अनोळखी तीन व्यक्तींबाबत त्यांच्याकडे तपास करणे गरजेचे आहे.
शिवाय शरद कळसकर याने बेळगाव तसेच कोल्हापूर येथे पिस्तूल तयार करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने तयार केलेल्या पिस्तूलाचा वापर या गुन्ह्यात झाला आहे का याबाबत सुद्धा तपास करणे गरजेचे आहे. गुन्ह्यात गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल घटनेपूर्वी कोणाकडे ठेवले होते. कोल्हापूरमध्ये कोणी आणि कोणाकडे आणून दिले याचा शोध घ्यायचा आहे. यासाठी कळसकर याच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
आजपर्यंत समीर विष्णू गायकवाड, वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे, विनय बाबुराव पोवार (फरारी), सारंग दिलीप अकोळकर, (फरारी), अमोल अरविंद काळे, वासुदेव भगवान सूर्यवंशी, भरत जयवनच्या कुरणे, अमित रामचंद्र देगवेकर आणि शरद भाऊसाहेब कळसकर हे गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी आहेत.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर एसआयटीने यापूर्वी सात जणांना अटक केली आहे तर दोन जण फरार आहेत. त्यांच्याकडून या गुन्ह्यासंदर्भात बरीच उकल झाली आहे.