उद्या होणार महत्वाकांक्षी अंतराळ यान प्रक्षेपित
नवी दिल्ली – भारताच्या महत्वाकांक्षी “चांद्रयान 2′ या भारताच्या या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेच्या प्रक्षेपणाची पूर्वतयारी केंव्हाच सुरू झाली आहे. या अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण उद्या (दि. 15, सोमवारी) होणार आहे. सोमवारी पहाटे 2 वजून 51 मिनिटांनी श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रातून “चांद्रयान 2′ अंतराळात सोडण्यात येणार आहे. त्यासाठी बेंगळूरुमधील “इस्रो’च्या उपग्रह केंद्रातून हा उपग्रह श्रीहरीकोटाकडे मार्गस्थ पाठवून देण्यात आला आहे. त्यासाठी श्रीहरीकोटा येथील लॉंच पॅडची तपासणी आणि प्रक्षेपणाची सर्व तांत्रिक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे, असे “इस्रो’ने म्हटले आहे.
मोहिमेचा उद्देश
चंद्रावरील पृष्ठभागाची पहाणी, करण्यासाठी चांद्रयानातील रोव्हर हे यानामधून चंद्राच्या जमिनीवर उतरवले जाईल. हे ठिकाण चंद्राच्या अक्षांशांच्या दक्षिणेकडे 70 अंशांवर असणार आहे. हे चंद्राच्या दक्षिणेकडील एक टोक आहे. या ठिकाणी सूर्याची किरणे सरळ न पडता तिरकी पडतात. त्यामुळे तेथील तापमान खूप कमी आहे. या भागामध्ये आतापर्यंत कोणत्याही देशाचे अंतराळ यान गेलेले नाही. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर 14 दिवस फिरून निरीक्षणे नोंदवली जातील. “चांद्रयान 2′ च्या मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी किंवा बर्फ सापडले, तर भविष्यात चंद्रावर मानवाची वस्ती होणे शक्य आहे का, याची चाचपणी करता येऊ शकेल.
या अंतराळाच्या प्रक्षेपणासाठी “इस्रो’कडून “जीएसएलव्ही-एमके 3’चा वापर केला जाणार आहे. चंद्रावरील संशोधनासाठी “चांद्रयान 2’बरोबर ऑरबिटर, लॅन्डर आणि रोव्हर ही सामुग्रीही या अवकाश यानाबरोबर पाठवली जाणार आहे. ही सर्व सामुग्री भारतातच तयार करण्यात आलेली आहे. या सर्व सामुग्रीचे वजन 3.8 टन इतके आहे. सोमवारी प्रक्षेपित होणारे “चंद्रयान 2′ याच वर्षी 6 किंवा 7 सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे अपेक्षित आहे. चंद्राच्य पृष्ठभागावर अंतराळ उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.