देवेंद्र फडणवीस: पाणीपुरवठ्याचा समतोल राखण्याची दक्षता घ्या
मुंबई – राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा भागात पुढील पाच वर्षात हे प्रकल्प मिशन मोडमध्ये वेळेत पूर्ण करावेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वर्षा निवासस्थानी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा नदीजोड प्रकल्प संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल आदी उपस्थित होते.
मनमाड पाणी पुरवठा योजनेला मान्यता
मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध नसल्याने सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपययोजना म्हणून करंजवण धरण ते मनमाड शहर थेट पाईपलाईन वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत सर्वेक्षण व तांत्रिक छाननी करून प्रारूप प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेची अंदाजे किंमत 297.77 एवढी असून ही योजना सुरू केल्यानंतर मनमाड नगरपरिषदेने त्यांचे देखभाल दुरुस्ती करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या योजनेसाठी लोकवर्गणीचा हिस्सा म्हणून नगरपरिषदेने दहा कोटींची तरतूद केली आहे.
फडणवीस म्हणाले, आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरना, पार-गोदावरी-दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबविण्याऐवजी राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या माध्यमातून ज्या भागामध्ये पाणीसाठा उपलब्ध होईल. त्या भागात पाणीपुरवठ्याचा समतोल राखण्याची दक्षता घ्यावी आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागात पाणी पुरवठा कसे करता येईल याचे योग्य नियोजन करावे.
वरील नदीजोड प्रकल्प तीन महामंडळात विभागले आहेत. या प्रकल्पाच्या एकत्रित व एकसूत्री अंमलबजावणीसाठी थेट शासनांतर्गत स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय (मुख्य अभियंता नदीजोड विशिष्ट प्रकल्प) स्थापन करावे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही अडचणी असल्यास त्यातून समन्वयाने योग्य तो मार्ग काढून लोककल्याणकारी प्रकल्प म्हणून कालमर्यादेत पूर्ण करावेत. त्यामुळे मराठवाडा आणि ज्या भागात दुष्काळ आहे त्या भागात पाणीसाठा उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.